हा ब्लॉग शोधा

बुधवार, ११ डिसेंबर, २०१९

हे भलते अवघड असते


हे भलते अवघड असते

आपल्या जवळच्या व्यक्तींना आपण किती जपतो, त्यांचं आपल्या आयुष्यात किती महत्त्व आहे हे ती व्यक्ती दूर जाते तेव्हा मनात येतं. तो पर्यंत आपण त्यांचं असणं गृहीत धरत असतो. नंतर आपण असं वागलो असतो, असं जपलं असतं त्या व्यक्तीला, हे सर्व विचार करून हळहळण्यात काहीच पॉईंट नसतो.

ती प्रिय व्यक्ती सोबत असताना आपल्याला तिची किंमत कदाचित आपल्याला कळत नाही कारण नकळत आपण गृहीत धरलेलं असतं कि आपली व्यक्ती कायम राहणार आपल्या सोबत! आपण काळाच्या ओघात विसरूनच जातो कि हे सर्व शाश्वत नाहीये. इथे शाश्वत असेल तर एकंच गोष्ट... ती म्हणजे मृत्यू !
या मृत्यूचीच सर्वात जास्त भिती वाटते. का ? तर आपण गुंतत जातो, नात्यांमध्ये, माणसांमध्ये, भावनांमध्ये ! संवेदनशील असलं ना तर जरा जास्तंच भिती वाटते मृत्यूची. कदाचित स्वतःच्या नसेलही वाटत, पण जवळची व्यक्ती नसू पण शकते या शक्यतेला सुद्धा मन घाबरतं, भिती वाटते. ही वेळ दुसऱ्यावर असेल तर आपण किती सहजतेनं म्हणून जातो कि "खंबीर रहा", "आम्ही आहोत या दुःखात सोबत", पण खरंच त्या व्यक्तीचं दुःख आपल्याला कळतं ? त्या व्यक्तीने त्याच्या जवळच्या माणसासोबत घालवलेले अनेक क्षण, आनंदाचे म्हणा किंवा दुःखाचे आपल्याला माहीतही नसतात. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातलं त्या जवळच्या माणसाचं महत्त्व आपल्याला कळण्याच्या पलीकडे असतं. अशा वेळी आपण सोबत आहोत एवढीच सांत्वना देऊ शकतो. या उपर काहीच शक्य नसतं. अवघड असते अशी वेळ...

आयुष्याचं पण विशेष आहे... सुख किंवा दुःख काहीच कायम राहत नाही. काही काळ खूप त्रास होतो आपलं माणूस नसण्याचा, पण हळू हळू सवय होत जाते त्या माणसाच्या नसण्याची. याचा अर्थ आपण त्यांना विसरलो का? तर नक्कीच नाही. कुठेतरी ती व्यक्ती नसण्याची सल मनात राहतेच. इतर गोष्टी, व्यक्ती, प्रेम यांमुळे त्या जखमेवर खपली येते. ती जखम बरी होतेही कदाचीत, पण ह्या जखमा व्रण मात्र सोडून जातात. ह्या जखमा असतात खऱ्या पण खरं कौशल्य त्यात अडकून पडता पुढे जाण्यात आहे. सोपं तर नक्कीच नसतं, वेळ सुद्धा भरपूर लागतो पण आयुष्याचा Show must go on...  इतरही महत्त्वाच्या व्यक्तींचं प्रेम स्वीकारायचं आणि move on करायचं आयुष्यात. आज ना उद्या आपलं destination पण तेच शाश्वत सत्य आहे, पण त्याचाच विचार करत कुढत जगण्यापेक्षा "आज" चा स्विकार करून मस्तपैकी जगणं जमलं पाहीजे

आयुष्य मस्तपैकी जगलंच पाहिजे...




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा